आता थांबायचा विचार! भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत; पक्षात नाराज?

    23-Jun-2025
Total Views |


मुंबई : आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असं वाटतं, असे म्हणत उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तसेच यावेळी त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याची खंतही बोलून दाखवली.

भास्कर जाधव म्हणाले की, "शरद पवार यांची साथ सोडली, त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, असं अजिबात नाही. मी शरद पवार यांना सोडल्याचा निर्णय चुकीचा होता, हे मी स्पष्टपणे बोललो. पण याचा अर्थ मला त्याची खंत वाटते असं अजिबात नाही. मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे मी तेव्हाही बोललो. आजही बोलतो आणि उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको? याचं कुणाकडे कारण असल्यास ते स्पष्ट करायला हवं. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रडत बसलो नाही. जे फुटून गेलो त्यांच्याबरोबरही मी गेलो नाही. मी लढत आहे," असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो. परंतू, शेवटी आता आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असं वाटतं. यापेक्षा वेगळं काहीही कारण नाही," असेही ते म्हणाले. त्यामुळे भास्कर जाधव राजकारणातून निवृत्ती घेणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील - संजय राऊत

यावर संजय राऊत म्हणाले की, "भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत. ते शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. गेल्या काही काळात शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचे नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. त्यांची भूमिका मी वृत्तपत्रातून वाचली. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणात असतात. त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. आक्रमक आहेत. छान बोलतात आणि छान लढतात, भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे? त्यांच्या काय वेदना आहेत? ते आम्ही नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहेत," असे ते म्हणाले.