शालेय अभ्यासक्रमातील ‘कोळीण’ या मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेला धड्यात संपूर्ण जीवनाचे सार गवसते. शांत, संयमी आणि निरंतर प्रयत्न हेच जीवनाचे सार आहे, हे या धड्यातून मुलांना शिकायला मिळते. या धड्याचे वैशिष्ट्य सांगणारा हा लेख...
इयत्ता सातवीच्या भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकात असलेला कोळी या कीटकावरचा ‘कोळीण’ हा धडा म्हणजे निसर्गाविषयी असलेल्या सूक्ष्म संवेदनशीलतेचे आणि निरीक्षणशक्तीचे एक विलक्षण उदाहरण आहे. सलग सहा वर्षे इयत्ता सातवीच्या वर्गाला मराठी विषय शिकवत असताना नियोजनाप्रमाणे मार्च महिन्यामध्ये ‘कोळीण’ हा धडा शिकवत असतो. हा धडा शिकवत असताना मला नेहमी जीवनाचे सार सापडत गेले. मारुती चितमपल्ली यांनी अत्यंत कष्टप्रद प्रवास करून विद्यार्थ्यांसाठी ‘कोळीण’ धडा लिहिला आहे. ‘कोळीण’ या पाठाच्या अनुषंगाने चितमपल्ली यांचे जीवन, त्यांच्या साहित्यिक जाणिवा, निरीक्षणशक्ती, निसर्गदृष्टी आणि माणुसकीची सामाजिक जाण या सर्वांशी या धड्याचा असलेला संबंध स्पष्ट करतो.
एका साध्याशा मादी कोळ्याच्या वागणुकीतून लेखकाने जो निसर्गचित्राचा पट उलगडला आहे, तो फक्त एखादा वैज्ञानिक किंवा संशोधकच नव्हे, तर खर्या अर्थाने निसर्गप्रेमीच उलगडू शकतो. हा धडा वाचताना प्रथमदर्शनी वाटते की, लेखकाने केवळ एका कोळ्याच्या हालचालींवर आधारित माहिती दिली आहे. पण जसे आपण ओघात वाचत जातो, तसे समजते की लेखकाने कोळी, त्याचे जाळे, शिकार करण्याची पद्धत, सावधपण आणि जाळ्यात अडकलेल्या कीटकांविषयी असलेले व्यवहार कौशल्य, हे सर्व बारकाईने आणि मोठ्या प्रेमाने पाहिले आहे. सूक्ष्म निरीक्षणाची ही नजर आपल्याला मारुती चितमपल्ली यांच्या संपूर्ण साहित्यिक जीवनात दिसते.
चितमपल्ली यांचे जीवन म्हणजे जणू चालते-बोलते निसर्गविज्ञान आहे. त्यांनी जंगलात अनेक वर्षे काढली. विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे, सरपटणार्या प्राण्यांचे, जलचरांचे आणि वनस्पतींचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात, लेखात आणि गोष्टीत हीच सहजता आपणास पहावयास मिळते. जिथे निसर्ग फक्त अभ्यासाचा विषय नसतो, तर आत्मीयतेचा, मैत्रीचा आणि सहजीवनाचा अविभाज्य भाग असतो.
‘कोळीण’ हा धडा वाचताना आपण बघतो की, लेखक त्या कोळणीला फक्त एक कीटक समजत नाही, तर ती एक जाळे विणणारी, शिकार करणारी, आपले अस्तित्व टिकवणारी हुशार सजीव म्हणून तिचे चित्र रेखाटलेले आहे. मारुती चितमपल्लींच्या लेखनात अशीच दृष्टी आढळते. त्यांनी ’पक्षी जाय दिगंतरा’, ’प्राणीकोश’, ’पक्षिकोश’ अशा ग्रंथांमध्ये प्रत्येक प्राणी-पक्ष्याच्या वागणुकीकडे मानवतेच्या नजरेने पाहिले. ते निसर्गावर केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून नव्हे, तर भावनिक आणि जीवनाभिमुख दृष्टीने विचार करत.
कोळीण जशी आपले जाळे विणण्यासाठी मेहनत करते, वेळ घेते, सावध राहते आणि अचूक निर्णय घेते, तसाच संयम आणि काटेकोरपणा मारुती चितमपल्ली यांच्या लेखनात दिसतो. त्यांच्या शब्दांची मांडणी, वर्णनशैली आणि भावविवेक हे सगळे त्या कोळणीच्या जाळ्यासारखे गुंफलेले असते. नाजूक, पण मजबूत. त्यांनी अनुभवलेला निसर्ग हा केवळ दूरदर्शनवरील डॉक्युमेंटरीसारखा नाही, तर प्रत्यक्ष जंगलात भटकून, स्थानिक लोकांशी संवाद साधून आणि दररोजच्या निरीक्षणातून साकारलेला आहे.
अणुप्रमाणे सूक्ष्म तपशील सांगणे आणि त्या तपशिलाला जीवनाच्या मोठ्या प्रश्नांशी जोडणे, ही मारुती चितमपल्लींच्या शैलीचे वैशिष्ट्य होते. उदाहरणार्थ, कोळीण कशी आपल्या अन्नसाखळीचा एक भाग असते, तशीच माणसानेही आपली भूमिका निसर्गात अडथळा न आणता निभावली पाहिजे, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांचे लेखन देते. चितमपल्ली कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या कीटकासारख्या कोवळ्या गोष्टींमध्येही जीवनदृष्टी पाहायचे. त्यामुळे त्यांच्या लेखनाचा प्रत्येक परिच्छेद ’कोळीण’सारख्या धड्याशी समांतर जातो. ’कोळीण’ म्हणजे चितमपल्लींच्या साहित्यदृष्टीची, सहवेदनेची आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीची छोटीशी झलक आहे. हा पाठ जेव्हा जेव्हा मी विद्यार्थ्यांना शिकवतो, तेव्हा तेव्हा मी त्यात गुंतत गेलो आहे. माझ्याबरोबरच माझे विद्यार्थी गुंतलेले मला नेहमी जाणवले आहे. हा पाठ मला जीवन जगायला प्रोत्साहित करत आहे. आज मारुती चितमपल्ली गेले याचे दुःख आहेच, पण त्याचबरोबर पक्षी, प्राणी, झाडेझुडपे, जंगल, कीटक हे यापुढे आपला अभ्यास कोण करणार, आपल्याप्रति संवेदनशीलता कोण जपणार, या भावनेने पोरके झाले आहेत.
अजय पाटील
8422031680
(लेखक भिवंडी तालुक्यातील राहनाळ येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक आहेत.)