महाराष्ट्रात पक्षिमित्र घडवण्यासाठी मोठी चळवळ उभी करणार्या ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ या संघटनेसोबत मारुती चितमपल्ली यांचे वेगळे नाते होते. त्याविषयी विशद करणारा हा लेख.
निवृत्त वनाधिकारी व प्रसिद्ध निसर्ग लेखक ही मारुती चितमपल्ली यांची ओळख. असे असेल, तरी ख्यातनाम पक्षीतज्ज्ञ हीच त्यांची खरी ओळख होती. नोकरीच्या सुरुवातीला कोयंबतूरला वानिकीचे शिक्षण घेत असताना त्यांनी फॉरेस्ट्रीसोबतच पक्षीशास्त्र आत्मसात केले. तेथून ते नोकरीत रुजू झाले, ते पक्षीनिरीक्षक म्हणूनच. ही गोष्ट 1960 सालची. 1970 साली त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्यात मुद्दामहून बदली करून घेतली. डॉ. सालिम अली हे तेव्हा सुटी असली की, आपल्या गावी किहीम येथे जात असत. तेव्हा कर्नाळा येथे थांबत. याच काळात चितमपल्ली आणि डॉ. सालिम अली यांची भेट होत असे. पक्ष्यांच्या नोंदी व टिपणे कशी लिहावीत, हे धडे त्यांना येथेच मिळाले. त्यांच्यामुळे माझ्या संशोधनाला शिस्त लागली, असे चितमपल्ली यांनी लिहून ठेवले आहे. पक्षीनिरीक्षण आणि जंगलातील अनुभव यावर ते साधारणतः 1975 पासून लिहू लागले.
त्यांचे पहिले पुस्तक ‘पक्षी जाय दिगंतरा’ हे 1983 साली प्रकाशित झाले. दुसरे प्रसिद्ध पुस्तक ‘जंगलाचं देणं’ प्रकाशित झालं 85 साली. त्याचवेळी महाराष्ट्रात एक नवीन चळवळ सुरू झाली होती. पुण्यातील पक्षी अभ्यासक प्रकाश गोळे यांनी पुढाकार घेऊन लोणावळा येथे महाराष्ट्रातील पक्षिमित्रांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दि. 10 जानेवारी 1981 रोजी पार पडलेल्या पहिल्या संमेलनास चितमपल्ली उपस्थित होते. पक्षिमित्र चळवळीची सुरुवात येथूनच झाली. ’पक्षिमित्र’ हा शब्द हळूहळू सामान्यांपर्यंत पोहोचला, तो पुढे सातत्याने होत राहिलेल्या संमेलनांमुळे. ‘महाराष्ट्र पक्षिमित्र संघटने’सोबत मारुती चितमपल्ली यांचे अगदी चळवळीच्या सुरुवातीपासून म्हणजे 1981 पासून जुळलेले ऋणानुबंध पुढे अधिकच दृढ होत गेले. 1981 साली लोणावळा येथून सुरू झालेल्या या चळवळीने बाळसं धरलं, ते विदर्भाच्या भूमीत. चितमपल्ली त्यावेळी विदर्भातील नवेगावबांध, भंडारा, मेळघाट अशा ठिकाणी नोकरीस होते. ते नागपुरात राहात असत. पहिले विदर्भ पक्षिमित्र संमेलन 1983 साली नागपुरात पार पडले. या संमेलनास चितमपल्ली हे उद्घाटक म्हणून लाभले होते. पुढे नाशिकच्या डिसेंबर, 1985 रोजी पार पडलेल्या सहाव्या महाराष्ट्र स्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. पुढे ते अनेक संमेलनांना उपस्थित होते.
2013 साली अमरावती येथे पार पडलेल्या 26व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनास ते उद्घाटक म्हणून लाभले. 2014 साली ते नागपुरातील 27व्या संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. चितमपल्ली सर्वांशी मोकळेपणाने गप्पा मारीत. मार्गदर्शन करीत. या त्यांच्या वागण्यामुळे पक्षिमित्रांना हुरूप येत असे. त्यांच्या आठवणी आज महाराष्ट्रातील अनेक पक्षिमित्रांकडे जतन करून ठेवलेल्या दिसतील. 2020 साली त्यांना ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’तर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस दि. 5 नोव्हेंबर हा असून जगप्रसिद्ध पक्षी संशोधक डॉ. सालिम अली यांचा जन्मदिवस दि. 12 नोव्हेंबर आहे. हा योगायोग साधून ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’तर्फे दि. 5 नोव्हेंबर ते दि. 12 नोव्हेंबर हा ‘पक्षी सप्ताह’ साजरा करण्याची 2017 पासून सुरुवात केली होती. पुढे आम्ही पाठपुरावा करून हा ‘पक्षी सप्ताह’ शासन स्तरावरसुद्धा मंजूर करून घेतला. ’महाराष्ट्र पक्षिमित्र’ची ही एक मोठी उपलब्धी होती. मारुती चितमपल्ली यांची पुस्तके वाचून आमच्या पिढीतील अनेकजण जंगल आणि पक्षीअभ्यास व संवर्धनाकडे वळले आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे आम्हाला मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या ग्रंथसंपदेतून पुढेसुद्धा ते मिळतच राहील.
डॉ. जयंत वडतकर
(लेखक ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत.)
9822875773