
सोलापूर शहरात जन्मलेला मारुती निसर्गात लपलेल्या एकांत महादेवाच्या दर्शनाने झाला. या अरण्यऋषीचे शिष्यत्व एकलव्याप्रमाणे स्वीकारलेल्या शिष्याच्या भेटीची ही कहाणी.
आपली प्रदीर्घ वनसेवा आणि साहित्य यज्ञाचा 65 वर्षांचा अश्वमेध यज्ञ संपवून चितमपल्ली 2020 मध्ये सोलापूरला परत आले. त्यावेळी सोलापुरातील साहित्य आणि वन्यजीवप्रेमींमध्ये नवचेतना निर्माण झाली. 90 वर्षांपलीकडच्या आपल्या प्रेरणास्रोताला भेटण्यासाठी अनेकजण उत्साही झाले. परंतु, कोरोना काळातील बंधनामुळे त्यांची इच्छा पूर्ण होत नव्हती. काही काळाने जेव्हा महामारी नियंत्रणात आली, तेव्हा महाराष्ट्र शासनाने 2020 साली दि. 5 नोव्हेंबर ते दि. 12 नोव्हेंबर हा कालावधी अनुक्रमे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आणि पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने शासकीय स्तरावर ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. त्यावेळी त्यांना घरी भेटायला येणार्यांची रीघ वाढू लागली. इतक्या वर्षांनी आपल्या घरी परतलेल्या अरण्यऋषींना पाहून त्यांचे कुटुंबीय तर आनंदलेच होते, पण समस्त सोलापूरही त्यांच्याबरोबर कुटुंबमय झाले होते. अनेकांचा त्यांच्याशी वैयक्तिक परिचयदेखील नव्हता, पण तरीही आपुलकीचे निसर्गबंध सगळ्यांना त्यांच्याकडे खेचून आणत होते. त्यांपैकी मीही एक होतो. भेटीच्या अपेक्षेने भारावलेला एकलव्य. सर्व स्तरांतून ‘पक्षी सप्ताहा’चे नियोजन आखण्यात येत होते. पण अजूनही शाळा-महाविद्यालये बंद होती. नागरिकांना एकत्रित येण्यावर मर्यादा होत्या. अशा वेळी बंदिस्त जागेमध्ये कार्यक्रम घेणार कसे? म्हणून वनविभागाने सिद्धेश्वर वनविहार येथे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली कक्ष उभारून ग्रंथालय आणि वाचनालय उद्घाटनाला सज्ज केले. महानगर पालिकेने सन्मानपत्र देऊन गौरव करण्याचे जाहीर केले. वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धांच्या जाहिराती झळकू लागल्या. मात्र, ज्या व्यक्तींनी आयुष्यभर मोकळ्या जंगलात वन्यजीवांच्या मागे आपल्या जीवनातील अमर्यादित काळ घालवला, त्यांच्या सन्मानार्थ साजरा होणारा उत्सव मर्यादित लोकांसाठी कसा राहू शकतो, या भावनेने माझे मन अस्वस्थ होत होते. लोकांना एकत्रित करून कार्यक्रम घेण्यास किंवा तसे करण्याचे आवाहन करण्यासही बंदी होती. मला एक कल्पना सूचली. ती म्हणजे, पक्ष्यांच्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन. सोलापुरात रोज पहाटे अनेक लोक फिरायला बाहेर पडत होती. आरोग्याच्या दृष्टीने लोकांना अशी परवानगी मास्क घालण्याच्या अटींवर देण्यात आली होती. शहरात ज्या ज्या ठिकाणी लोक पहाटे फिरायला येतात, त्या त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेने पक्ष्यांच्या फोटोंचे प्रदर्शन लावायचे ठरवले. अरण्यऋषी ज्या ठिकाणी राहात होते, ते अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर. पहाटे 3.30 - 4 वाजता त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. रस्त्याच्या दिव्यांच्या खांबाला तार बांधून चिमट्यांनी फोटो लावले. ‘पक्षी सप्ताहा’चा बॅनर लावला. उद्घाटनासाठी त्याला केशरी रिबिन लावली. मात्र, उद्घाटनाशिवाय प्रदर्शन तसेच चालू झाले. पुढच्या वळणावर रंगीबेरंगी पक्ष्यांची छायाचित्रे पाहून लोकांच्या माना आपसूक वळू लागल्या. पहिल्याच दिवशी पहिल्या ठिकाणी पहाटे 5 ते 8 वाजेपर्यंत 1 हजार, 800 ते दोन हजार लोकांनी आमच्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन पाहिले. हौशी पक्षिमित्रच नाही, तर सर्वसामान्य नागरिकही कुतूहल आणि उत्साहाने प्रेरित झाले. हा कोणता पक्षी? कुठे दिसतो? काय खातो? याचे नाव काय? बाबा, हा पक्षी बघा, किती सुंदर आहे! मुलांचा उत्साह तर औरच!
लोकांचा ओघ कमी झाल्याने आम्ही प्रदर्शन काढण्याची चर्चा करत होतो. तेवढ्यात सिद्धेश्वर वनविहार येथे ‘पक्षी सप्ताहा’च्या शासकीय कार्यक्रमासाठी अरण्यऋषी घराबाहेर पडले. वनविभागाची मोटार अरण्यऋषींना घेऊन रस्त्यावरून कॉलनीतून बाहेर पडली आणि सकाळी उद्घाटनासाठी म्हणून केशरी फीत लावलेल्या बॅनरजवळ थांबवली. काळी काच खाली सरकली आणि चेहर्यावर अलौकिक तेज असलेली छबी नजरेस पडली. संसर्गापासून बचावासाठी काचेचा फेस मास्क घातलेले गुरूवर्य अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली प्रत्यक्ष आमच्यासमोर होते. त्यांना पक्ष्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाची माहिती सांगितली आणि उद्घाटनाची रिबिन त्यांच्या हातात दिली. रिबिन ओढून त्यांनी छायाचित्रांच्या फिरत्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ज्यांच्या सन्मानार्थ संबंध महाराष्ट्र पक्षी सप्ताहाचा निसर्गोत्सव साजरा केला जात होता, त्या गुरूवर्याचा पहिला सहभाग आपल्याच उपक्रमात. काय हा योग! काय ते भाग्य! जितक्या अचानक ती गाडी अरण्यऋषींना घेऊन आली, तितक्या वेगाने ती धुराळा उडवत पुढच्या कार्यक्रमाला निघून गेली. उत्साहाने भारावून टाकणारी ही 2020 मधली आमची पहिलीच गुरूभेट.
पहिल्या दिवशी अरण्यऋषींच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाची बातमी त्यांच्या मोटारीने उडवलेल्या धुराळ्याप्रमाणे शहरात पसरली. उद्या कुठे आहे प्रदर्शन? किती वाजेपर्यंत ठेवणार प्रदर्शन? अनेकांचे फोन येऊ लागले. सात दिवसांत 12 ते 15 हजार लोकांनी हे अनोखे पक्ष्यांच्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन पाहिले. शेवटच्या दिवशी सोलापूर महानगर पालिकेच्या आवारातील हिरवळीवर आयुक्तांच्या उपस्थित याच प्रदर्शनाच्या साक्षीने मोठा सांगता समारंभ झाला. तोही अरण्यऋषींच्या उपस्थितीत. अरण्यऋषींच्या गुरूभेटीने प्रेरित आणि सहवासाने आशीर्वादित झालेले प्रदर्शन आणि एकलव्याप्रमाणे शिष्य म्हणून हे जीवन पुढे सतत जैवविविधतेचा जागर मांडत राहील.
पंकज चिंदरकर
7083460066
(लेखक सोलापूरमधील वन्यजीवअभ्यासक आहेत)